छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालवले : शरद पवार   

पुणे : भारतात अनेक राजे होऊन गेले. त्यांनी कर्तृत्व दाखवले; पण त्यांचे राज्य कुटुंबापुरते सीमित होते. निजाम आणि मुघलांचेही राज्य होते. शिवछत्रपतींच्या राज्याला मात्र कोणी भोसल्यांचे राज्य म्हटले नाही. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालवले. रयतेचे आदर्श राज्य निर्माण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी केले.
 
शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘शिवपुत्र महोत्सवा’त ते बोलत होते. राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांना ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ आणि माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष चेतना गाला-सिन्हा यांना ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शैलजा मोळक लिखित ‘जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी भाग २’ व रजिया सुलताना लिखित ‘ताराबाई शिदेंच्या निबंधातील सामाजिक वास्तव’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. शिवस्पर्श दत्तक योजनेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. आमदार बापू पठारे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रतिष्ठानचे विश्वस्त राजाभाऊ चोपदार, अध्यक्ष शैलजा मोळक, ज्ञानेश्वर मोळक आणि ज्ञानेश मोळक उपस्थित होते. ज्येष्ठ लेखक बाबा भांड अध्यक्षस्थानी होते.
 
मराठी लोकांची लक्षात राहणारी बडोदा आणि ग्वालियर ही राज्ये होती. राज्य कसे चालवायचे याचा आदर्श सयाजीरावांनी घालून दिला. शेती, पाणी, शिक्षण असे कार्य करतानाच त्यांनी सामान्य माणसाला जगण्याचा सन्मान दिला, असे पवार यांनी सांगितले. चेतना गाला-सिन्हा यांच्या कार्याचा गौरव करताना पवार यांनी माणदेशातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘दुष्काळ हा माणदेशाला लागलेला रोग असला तरी माणदेशाचा माणूस कधीही मागे राहिला नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने कर्तृत्व गाजवले. गीतरामायण लिहिणार्‍या गदिमांसारखा उच्च दर्जाचा साहित्यिक माणदेशाने दिला. सावळाराम पाटील (पी. सावळाराम) यांच्यासारखा कवी दिला. देशातील पहिली सर्कस माणदेशात सुरू झाली.’
 
चेतना गाला-सिन्हा म्हणाल्या, जयप्रकाश नारायण यांच्यामुळे मी ग्रामीण भागात काम सुरू केले. माणदेशात महिलांना दगड फोडताना पाहून मी हादरून गेले. तेव्हा मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि म्हसवडला आले. पती विजय सिन्हा यांच्या सोबतीने ग्रामीण भागात काम सुरू केले. माणदेशी महिला बँक सुरू झाली. ताराराणींनी तलवारीतून विरोधक संपवले. आमच्या महिलांकडे तलवार नाही; पण ताकद आहे.
 
डॉ. प्रकाश पवार म्हणााले, शिवरायांचे अंतिम उद्दिष्ट युद्ध नव्हते. त्यांना शांतता निर्माण करायची होती. त्याच भूमिकेतून त्यांनी लोकशाहीसाठी भूमी तयार केली. महिलांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांनी ज्ञानाला महत्त्व दिले. विज्ञान विषयक दृष्टी निर्माण केली.

Related Articles